तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या ‘पीएलजीए’ (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ ‘मल्ला’ याने आपल्या ४० सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली . यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला ओहोटी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
शरण आलेल्या या नक्षल्यांनी केवळ आत्मसमर्पण केले नाही, तर त्यांच्याकडील एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या आधुनिक स्वयंचलित शस्त्रांचा साठाही पोलिसांकडे सुपूर्द केला. सध्या केशालू हा संघटनेतील सर्वात प्रभावी मोहरा मानला जात होता. कर्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम भागात वावरणारा हा जहाल कमांडर २५ हून अधिक माओवादी तुकड्यांचे नेतृत्व करत होता. तो आता मुख्य प्रवाहात सामील झाल्याने माओवाद्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.


