विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने आता वनविभागाने मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाठविलेले तीन वाघ सह्याद्रीच्या वातावरणात उत्तमरीत्या रमल्यानंतर, आता पुन्हा विदर्भातून पाच वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे अस्तित्व नगण्य झाले होते. मात्र, निसर्गसाखळी कायम राखण्यासाठी तिथे वाघ असणे गरजेचे आहे. विदर्भात विशेषतः पेंच आणि ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रादेशिक वर्चस्वासाठी वाघांमध्ये झुंज होतात. हे टाळण्यासाठी आठ वाघांना टप्प्याटप्प्याने पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात सोडले जाईल. यापूर्वी पाठविलेले वाघ तिथे ‘रमले’ असल्याने वनविभागाचा आत्मविश्वास वाढला आहे. सह्याद्रीत २५ ते ३० वाघांचे संगोपन होऊ शकते, असे नियोजन आखले आहे.


