गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना अखेर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी पूर्णविराम दिला आहे. “विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर या विषयाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.
खासदार अमर काळे यांनी एक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार जिवंत असताना दोन मोठ्या नेत्यांमध्ये विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. इतकेच नव्हे, तर विलीनीकरणासाठी एक विशिष्ट तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर हा विषय मागे पडला.सध्या विलीनीकरणाच्या बातम्यांमध्ये कोणतेही ठोस तथ्य नाही. विलीनीकरणासारखा मोठा निर्णय केवळ पक्षश्रेष्ठी (शरद पवार आणि वरिष्ठ नेते) घेऊ शकतात. जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारणा केली, तर आम्ही आमचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे निश्चितपणे मांडू, असेही काळे म्हणाले.


