नांदेड

निर्यातीअभावी भाव पडले, लाखो रुपयांचा खर्च मातीत

अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, ७० ते ८० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. सध्या पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. मात्र, बाजारपेठेत केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता केळीच्या दरातील मोठी घसरण आणखी गंभीर समस्या ठरत आहे.

गतवर्षी मे महिन्यात लागवड केलेली केळी एप्रिल महिन्यात काढणीस आली असताना अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी केळीचे घड काढून ठेवले असले, तरी व्यापारी खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने अनेक ठिकाणी केळी शेतातच पिकून जात आहेत. काही शेतकरी नाईलाजाने केळीचे घड कापून जनावरांना चारा म्हणून टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील केळी चविष्ट व स्वादिष्ट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र सध्या इराण-अमेरिका युद्धामुळे आखाती देशांमध्ये होणारी केळी निर्यात बंद झाली असून, याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. गतवर्षी मे महिन्यात केळीला २१०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. मात्र, यंदा तोच दर घसरून केवळ ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *