आखाती देशांमध्ये सुरू युद्धाचे पडसाद आता मुंबईसह महामुंबईतील बांधकाम क्षेत्रावर उमटू लागले आहेत. आयात होणाऱ्या बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने प्रकल्पांचा वेग मंदावला आहे. तर बांधकामाचा वेग कमी झाल्याने कामगारांवरही परिणाम झाला आहे. काम कमी झाल्याने अंदाजे १० ते १५ टक्के कामगार गावी परतल्याची माहिती बिल्डरांनी दिली. यामुळे प्रकल्पांना विलंब होण्याची भीती आहे.
बांधकामासाठी टाइल्स, कच्चा माल व इतर साहित्य प्रामुख्याने आखाती देशांतून समुद्री मार्गाने भारतात येते. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे समुद्री मार्गावर निर्बंध आले. परिणामी जहाजांना वळसा घालून यावे लागत असून कंटेनरमागे सुमारे साडेतीन लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.


