तळोद्याच्या राजकीय समीकरणात मोठा बदल – शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते शिंदे गटात प्रवेशासाठी मुंबई रवाना
तळोदा : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गुरुवारी तळोदा शहर व तालुक्यातील मोठा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी मुंबई येथे पार पडणार आहे. या प्रवेशामुळे तळोदा शहराच्या राजकीय समीकरणात मोठे बदल घडणार असल्याची चर्चा आहे.
नंदुरबार जिल्हा प्रमुख चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुवा येथील शिंदे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
तळोदा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे एक माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करणार होते, मात्र काही कारणास्तव त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपमध्ये वाढलेली गर्दी आणि त्यातील राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे काही जण अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहे. या अस्वस्थतेचा फायदा शिंदे शिवसेनेला होण्याची शक्यता आहे.
तळोद्याच्या राजकारणाला नवा पॅटर्न ?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधी भूमिका घेतलेले हे नेते आता शिंदे गटात प्रवेश करत असल्याने स्थानिक राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. शिंदे गट सत्तेत असल्याने भाजपशी त्यांचे मैत्र जुळवून येणार की स्थानिक स्तरावर संघर्ष वाढणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यात भाजप मधील अंतर्गत कलह देखील काही अंशी कारणीभूत असल्याचं समजते. काही बड्या नेत्यांमध्ये एकमत नसल्याने राजकीय कुरखोडी वाढत असून त्याचा राजकीय स्फोट कधीही होऊन शिंदे गटाला फायदा होऊ शकतो.
तळोदा शहरातील राजकीय परिस्थिती पाहता, आगामी पालिका निवडणुकीत शिंदे गटाची लढत भाजपसोबत होण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप असे चित्र निर्माण होऊ शकते, कारण दोन्ही पक्ष राज्यात सोबत असले तरीही शहरातील स्थानिक राजकारण मात्र खूप वेगळे असल्याने येणाऱ्या काळात राजकीय संघर्ष पहायला मिळू शकतो.
सत्ता महत्त्वाची की संघर्ष ?
वर्षानुवर्षे विरोधात राहून संघर्ष करणाऱ्या नेत्यांसाठी हा प्रवेश राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाचा आहे. संघर्ष करून राजकीय अस्तित्व राखता येते, पण लोकांची कामे करण्यासाठी सत्ता महत्त्वाची असते, असा विचार या नेत्यांच्या प्रवेशामागे असल्याचे सांगितले जात आहे.
” सत्ता में है तो सेफ है ”
हा विचार देखील अनेकांच्या मनात असल्याने हा पक्षप्रवेश अधिक चर्चेत आहे. आगामी काळात तळोद्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भाजप मध्ये देखील या पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी मध्ये राहून संघर्ष करणाऱ्या काही नेत्यांनी भाजप मध्ये दोन वर्षांपूर्वी प्रवेश केल्याने संघर्ष कोणालाच नको सत्तेत राहून कवच कुंडले मध्ये स्वतःला सुरक्षित ठेवायचे हे एकमेव गणित सर्वच प्रवेश मागे दिसत आहेत त्यात भाजप मध्ये प्रवेश करणारे देखील सूटत नाही
कालीचरण सूर्यवंशी✒️
