अमरावती

काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका

मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हाच अजेंडा आहे. त्यामुळे पटत नसले तरी ते एकत्र आले, अशी टीका शिंदेसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे नाव न घेता बुधवारी येथे केली.

येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीरसभेत शिंदे म्हणाले, की शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप त्यांनी केले होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे शिवसैनिक असल्यानेच उठाव केला आणि शिवसेना दावणीतून मुक्त केली. त्यामुळे विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने शिवसेनेला मोठे यश मिळाले.
विजयाचा ‘स्ट्राइक रेट’ चांगला असून ताेच कायम ठेवत अमरावती महापालिकेवर भगवा फडकवा. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबईच्या तिजोरीत त्यांचा जीव अडकलेला आहे

अकोला : बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असल्याचे जे सांगतात, ते नगरपालिका निवडणुकांत कुठेही दिसले नाहीत. ते फक्त ‘मुंबई एके मुंबई’ एवढाच जप करतात. मुंबईच्या तिजोरीत त्यांचा जीव अडकलेला आहे. मुंबईकडे ते सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात. त्यामुळेच नगरपरिषद निवडणुकांत जनतेनेही त्यांना घरी बसवले, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button